लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीला तीन प्रमुख पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट मिळून राज्यात तब्बल 232 जागा मिळाल्या, दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावलं लागलं. विधानसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. महाविकास आघाडीचे दिग्गज नेते महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. मात्र आता काँग्रेसमधील नेते देखील महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.